जेव्हा महाराष्ट्रातील आमदारानं पेटत्या विमानातून उडी मारली होती ; अहमदाबाद विमान अपघातानंतर 32 वर्षांपूर्वीच्या थरारक घटनेची चर्चा
परिवर्तन एक शोध टीम / प्रतिनिधी ;
Written by : © Ajay Bhujbal
Published: June 16, 2025 08:40 AM (IST)
अहमदाबादमध्ये नुकत्याच घडलेल्या भीषण विमान अपघाताने देशभरात यापूर्वीच्या विमान दुर्घटनेच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, आजपासून 32 वर्षांपूर्वी, 26 एप्रिल 1993 रोजी छत्रपती संभाजीनगर (तत्कालीन औरंगाबाद) येथे घडलेला आणि 55 निष्पाप जीवांचा बळी घेणारा एक हृदयद्रावक विमान अपघात पुन्हा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, या अपघातातून माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी पेटत्या विमानातून उडी मारून आपले प्राण वाचवले होते, त्यांची ही थरारक कहाणी पुन्हा एकदा लोकांसमोर आली आहे.
नेमकं काय घडलं त्या दिवशी?
26 एप्रिल 1993 रोजी इंडियन एअरलाईन्सचं दिल्ली-जयपूर-उदयपूर-छत्रपती संभाजीनगर-मुंबई हे विमान छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा विमानतळावर उड्डाणासाठी सज्ज होतं. विमानाने उड्डाण घेतलं खरं, पण त्याला अपेक्षित उंची गाठता आली नाही. धावपट्टीला लागूनच असलेल्या बीड-संभाजीनगर महामार्गावरून त्यावेळी एक कापसाचा ट्रक जात होता. विमानाची चाके या ट्रकला घासली आणि त्यानंतर ते परिसरातील विद्युतवाहिनीवर आदळून एका शेतात कोसळले. या भीषण आघातानंतर विमानाचे तीन तुकडे झाले आणि त्याला आग लागली. या दुर्घटनेत विमानातील 55 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.
10-15 फुटांवरून उड्या मारल्या म्हणून वाचलो!' - रामप्रसाद बोर्डीकर
या अपघातातून सुदैवाने बचावलेले माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी त्या भयावह क्षणांची आठवण सांगितली. "ज्यावेळेस हे विमान उडालं, त्यावेळेस त्याला अपेक्षित उंची गाठता आली नाही. धावपट्टीला लागूनच असलेल्या बीड बायपासवरून वाहनं जात होती. तिथं एका ट्रकमध्ये कापसाच्या गाठी होत्या. या ट्रकला विमानाचे टायर घासले आणि मग ते काही क्षणात भरकटत भरकटत शेतात जाऊन पडलं," बोर्डीकर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, "दरम्यानच्या काळात विमानातील एअर होस्टेसनी आम्हाला सूचना दिली आणि विमानाचे दरवाजे उघडले. विमान त्यावेळी 10 ते 15 फूट उंचीवर होतं. आम्ही काही जणांनी पटापट उड्या मारल्या म्हणून वाचलो. आमच्यापैकी काही जण भाजले होते, तर काहींना मार लागला होता. पुढं ते विमान शेतात घासत घासत गेलं होतं. विमानाचे तुकडे पडले होते. नशीब चांगलं होतं म्हणून आम्ही वाचलो, पण या घटनेत 55 लोकांचा जीव गेला होता."
छत्रपती संभाजीनगरवरील खोलवर परिणाम
या दुर्घटनेत छत्रपती संभाजीनगरच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणाऱ्या अनेक उद्योजक आणि मान्यवरांचाही मृत्यू झाला होता. यात उद्योजक नंदलाल धूत, अरुण जोशी, राजेंद्र मोटार्सचे दीपक मुनोत यांचा समावेश होता.
तत्कालीन उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनीही घटना घडल्यानंतर तात्काळ अपघातस्थळाला भेट दिली होती. त्यांच्या कन्या भक्ती चपळगावकर यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये सांगितले आहे की, त्यांचे वडील जेव्हा पाहणीसाठी गेले होते, तेव्हा विमान आधी एका ट्रकला आणि नंतर विजेच्या तारांमध्ये अडकून पडल्याचे त्यांना दिसले होते. छत्रपती संभाजीनगरमधील अनेक लोकांना या अपघाताची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष झळ बसल्याचे आजही स्थानिक लोकांशी बोलल्यावर कळते.
धावपट्टीच्या बाजूलाच रस्ता
ज्येष्ठ पत्रकार संजय वरकड, ज्यांनी 1993 मध्ये नुकतीच पत्रकारितेला सुरुवात केली होती, त्यांनीही या अपघाताच्या आठवणी जागवल्या. "बीड-संभाजीनगर रोडवरून एक कापसाचा ट्रक चालला होता. इकडून विमानानं उड्डाण घेतलं, पण त्यानं अपेक्षित उंची गाठली नाही आणि मग विमानाची चाकं त्या ट्रकला धडकली. पुढे ते विमान आताच्या शेंद्रा-एमआयडीसी या भागात जाऊन पडलं," असे ते म्हणाले.
तत्कालीन छत्रपती संभाजीनगर विमानतळावरची धावपट्टी त्यावेळी लहान होती. 1993 मधील विमान अपघातानंतर, धावपट्टीला लागून असलेला तो रस्ता, जिथून कापसाचा ट्रक चालला होता, तो आता बंद करण्यात आला आहे. मात्र, धावपट्टीच्या अगदी बाजूलाच तो रस्ता असायला नको होता, अशी भावना आजही अनेकजण व्यक्त करतात. ही दुर्घटना केवळ छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातील एक काळा दिवसच नाही, तर विमान वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीनेही अनेक महत्त्वाचे धडे देऊन गेली आहे.




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा